तळीये गावात क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते; संपूर्ण गावच बनले स्मशान

Share this Newz

The Newz Biz Team, MAHAD

महाड तालुक्यातील तळीये गावात क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. २२ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास मोठा डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील ३५ घरे ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या ३५ घरांतील जवळपास ७०-८० लोकही ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शक्यता आहे. आतापर्यंत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र, गावाचे रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. संपूर्ण गावच उद्ध्वस्त झाले आहे, सोबत घरातील माणसे गाढली गेली आहेत.

तळये दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना हा मोठा धक्का आहे. तळीये गावात रेस्क्यू ऑपरेशन जोरात सुरु आहे. स्थानिक प्रशासनासोबत इतर ठिकाणच्या रेस्क्यू टीमही दाखल होत आहेत. ठाणे शहरातील एक रेस्क्यू ऑपरेशन टीम तळीये गावात पोहोचली.

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली ३५ घरे दबली गेली.

दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 38 वर पोहोचला. तर ८० ते ८५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.


Share this Newz