कर्जमाफी योजनेत समावेश करण्याची द्राक्ष उत्पादकांची मागणी

Share this Newz

पुणे,

राज्याते मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. त्यातही पुणे जिल्ह्यातही द्राक्ष उत्पादक आघाडीवर आहेत, चालू वर्षी लॉकडाऊनमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी खर्‍या अर्थाने देशोधडीला गेला आहे. यंदा द्राक्ष उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते मात्र, लॉकडाऊनच्या कालखंडात शेतकर्‍यांना द्राक्षाची बाजारपेठेत विक्री करता न आल्याने कर्जाचा डोंगर शेतकर्‍यांच्या डोक्यावर उभा राहीला आहे.

द्राक्ष उत्पादनासाठी घेतलेले पीक कर्ज दोन लाखाच्या पुढे अडीच किंवा तीन लाखापर्यंत जात असल्याने राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत त्याचा समावेश न झाल्यामुळे बागायतदार पुन्हा अडचणीत आले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे. 2019 आणि 2020 दोन वर्ष शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत हलाखीची आणि कर्जाच्या खाईत लोटणारी गेली आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या दोन-तीन वर्षापासून शेतकर्‍यांना कोणताही शेतीपासून उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादन घेताना शेतकर्‍यांचे 2019-20 या सालात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे 80 रुपयांचा दर फक्त सात ते दहा रुपयांवर आला. तोकडे उत्पन्न त्यातच कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याने अनु समझोता योजनेत पैसे भरूनही बँक आता द्राक्ष उत्पादकांना कर्ज देत नाही. त्यामुळे दुहेरी संकटात द्राक्ष उत्पादक शेतकरी सापडल्याचे चित्र पाहायला मिळते.


Share this Newz