द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असून, केवळ राजकीय आकसातून कारवाई केली जात आहे. छापे तपास यंत्रणा टाकत असली, तरी खुलासे मात्र भाजपचे नेते करीत आहेत. अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.
शरद पवार दोन दिवसांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यामध्ये शनिवारी दुपारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
पत्रकार परिषदेतील मुद्दे
– ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि एनसीबी या तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर
– राज्यात तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र, देशात काही घडलं तर त्याचे लागेबांधे महाराष्ट्रात दाखवून सीबीआय महाराष्ट्रात कारवाई करते.
– राजकीय आकसातून कारवाई केली जात आहे. राज्य सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे.
– महाराष्ट्र, तामिळनाडू, प. बंगालमधील सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारचा आटापिटा.
– अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे केलेले मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंग कोठे गायब आहेत ? याची माहिती घेण्याची जबाबदारी केंद्राची आहे.
– कोणाच्याही खिशात कोणतीही पुडी टाकून अमली पदार्थाचे सेवन केल्याबाबतचा आरोप करून अटक कशी काय केली जाऊ शकते ?
– नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणूनच एनसीबीची त्यांच्या जावयावर कारवाई. मलिक यांच्या जावायाकडे गांजा सापडला नाही, तर एक प्रकारची वनस्पती होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. तरी सहा महिने तुरुंगात कसे काय ठेवले.
– एनसीबीने कारवाई केलेल्या एका प्रकरणातील साक्षीदारच गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवाब मलिक यांच्या जावयाविरोधातही हेच केले आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या अटकेचे वाँरंट काढले आहे. गुन्हेगार आहेत त्यांना पंच कसे काय नेमले जाते ?
– ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एक पंच गुन्हेगार निघाला आहे. गुन्हेगारांना पंच करायचे आणि निर्दोष व्यक्तींना अडकवायचे हे कितपय योग्य आहे ?
– मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होतेवेळी सर्व आमदारांची आम्ही बैठक घेतली. उध्दव ठाकरे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नव्हते. आमदारांच्या बैठकीत मीच त्यांना हात वर करायला सांगितला. त्यामुळेच ठाकरे मुख्यमंत्री झाले. सर्वाधिक आमदार शिवसेनेचे होते. त्यामुळेच मी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याचा आग्रह धरला, ही वस्तुसिथ्ती फडणवीसांनी समजून घ्यावी.
– सत्ता गेल्याचे दु:ख फडणवीस यांना सहन हाेत नाही.
– अजित पवारांच्या तीन बहिणींच्या मालमतेवर आयकर विभागाने छापा टाकला. छापा टाकणारे त्यांच्या घरात एक ते दोन दिवस राहिले ठीक आहे; पण ‘तुम्ही तिथेच थांबा, असा आदेश असल्याने पाच दिवस १५ माणसांचा मुक्काम हाेता. एखाद्याच्या घरी १५ लोक पाठवणे योग्य आहे का ? वरून आदेश असल्यामुळेच हे लोक पाच दिवस बसून होते.
– ज्यांनी भाजपचे नेतृत्व केले एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खटले सुरु झाले. सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे, हा नवीन प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे.
– राज्यावर अनेक संकटे आली, पण मुख्यमंत्री व त्यांच्या सहकार्यांनी धीराने संकटांचा मुकाबला केला. कोरोना काळात राज्यातील डॉक्टर, नर्स यांनी मोलाची साथ दिली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्कृष्ट काम केले. प्रत्येकाची कामाची पद्धती वेगळी असते. विरोधकांनी जाणीवपूर्वक मुख्यमंत्री उद्धव ठाकरें टीका करु नये.
– मुळात ‘ते’ पुन्हा येईन म्हणाले होते, पण ते जमेना म्हणून सरकार अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न सुरू.
– राज्यातील सरकार स्थिर आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर करत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तुम्ही दवाबतंत्राचा वापर करा, छापे टाका. तुम्ही काहीही केले, तरीही आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेलच.







Leave a Review