मुंबई : निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आकांडतांडव करणाऱ्या भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खरा आदर असता, तर जळगावमधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. त्यांच्यावर २०१६ साली झालेल्या हल्ल्याची साधी दखलही फडणवीस सरकारने घेतली नाही, तीन वर्षे एफआयआरही दाखल केला नाही.
मुंबईत निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेली मारहाण असो वा इतर कोणत्याही व्यक्तीला मारहाण करणे हे निंदनीयच आहे. मुंबईतील प्रकरणात निवृत्त अधिकाऱ्याच्या न्यायासाठी धडपडणारा भाजप सोनू महाजनांना न्याय कधी मिळवून देणार, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
जळगाव येथील माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर २०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला. राज्यात त्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते. तेच गृहमंत्रीही होते, तरीही एफआयआर सुद्धा दाखल करून घेतला गेला नाही. उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु आजपर्यंत उन्मेष पाटील यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. संरक्षणमंत्री राजनाथसिंह किंवा त्यांच्या आधीच्या संरक्षण मंत्र्यांनीही याची दखल घेतली नाही. राजनाथसिंह सोनू महाजन यांच्यावरील हल्ल्याची दखल घेऊन फोन करणार आहेत का? सैनिका-सैनिकांमध्ये संरक्षणमंत्र्यांनी भेदभाव का करावा ? असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
मुंबईत निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेली मारहाण असो वा इतर कोणत्याही व्यक्तीला मारहाण करणे हे निंदनीयच आहे. मुंबईत झालेल्या या प्रकरणात तत्काळ एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जळगाव प्रकरणी तशी तत्परता का दाखवली गेली नाही, याचे उत्तर भाजपने द्यावे. पण भाजपाचे देशप्रेम, सैनिकांबद्दलचा आदर हे त्यांचेच आमदार प्रशांत परिचारक यांचे सैनिकांबद्दलचे वक्तव्य व जळगावचे महाजन मारहाण प्रकरण यावरून दिसून आले आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी सैनिक सोनू महाजन प्रकरणाचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असेही सावंत म्हणाले.











Leave a Review