पुुुणे : महाविकास आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकवता आले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातील आणि मराठा समजाच्या आयुष्यातील हा काळा दिवस आहे, अशा शब्दांत पाटील यांनी टीका केली.
पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील महाविकास आघाडीचा उल्लेख ‘महाभकास आघाडी’ असा करत जोरदार निशाणा साधला.
नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असे सांगत न्यायालयाने आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता मोठ्या खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम आमच्या सरकारने केले. हे आरक्षण काही महिने टिकल्यानंतर त्याला स्थगिती मिळाली. मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आमचे प्रयत्न राहिले. मात्र, महाभकास आघाडीच्या सरकारला सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकवता आले नाही.
हा विषय गांभीर्याने घ्या, असे आम्ही वारंवार सरकारला सांगत होतो. मात्र, आमच्या बोलण्याकडे हवे तसे लक्ष दिले गेले नाही. राज्य सरकारने गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना ते जमले नाही, अशी टीका पाटील यांनी केली.
Leave a Review