Kangna Ranut : मुंबईत येतेय, कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल, तर मला रोखून दाखवा

उर्मिला मातोंडकर : 'आमची मुंबई, मुंबई मेरी जान, जय महाराष्ट्र'
Share this Newz

मुंबई : आपण 9 सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याचे सांगत कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल, तर मला रोखून दाखवा असे ट्विट अभिनेत्री कंगनाने केले आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. दरम्यान, उर्मिलाने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्र हा भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे… छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे… ‘आमची मुंबई, मुंबई मेरी जान, जय महाराष्ट्र’ असे म्हटले आहे. या आशयाचे ट्विट करत उर्मिलाने कंगनावर टीका केली आहे.

कंगणाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘बरेच लोक मला मुंबईत परत येऊ नकोस, अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’.

सुशांत सिंह प्रकरणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भातील खुलासा समोर आल्यानंतर भाजपाचे आमदार राम कदम यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये कदम यांनी कंगणाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. “बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बॉलिवुडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे. पण, त्यासाठी तिला सुरक्षा देणे गरजेचे आहे. दुर्दैव म्हणजे १०० तास, ४ दिवस उलटून गेले, तरी महाराष्ट्र सरकारने अजून कंगनाला सुरक्षा पुरवलेलेली नाही”, असे ट्विट करत राम कदम यांनी कंगनाला सुरक्षेची मागणी केली होती.

त्यानंतर कंगनाने “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचे ट्विट केले.

महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावत, मुंबईची भीती वाटत असेल तर कंगनाने परत येऊ नये, अशी टीका राऊत यांनी केली होती. या वक्तव्यावरुन राऊत यांच्यावर टीका करताना कंगानाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली.

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि मी पुन्हा मुंबईत परत येऊ नये असे म्हटले. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता तर मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?,” असे ट्विट कंगानाने केले.

कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर त्यावर राम कदम यांनी पुन्हा रिप्लाय देताना एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. “अभिनेत्री कंगना रणौतचे, मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते हे विधान महाराष्ट्र सरकारसाठी खणखणीत चपराक आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप करुन महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या सक्षम प्रतिमेला मलीन केले” असे राम कदम म्हणाले होते.


Share this Newz