पुणे : कोरोनामुळे पुण्यातील पत्रकार बांधवाला आपला जीव गमवावा लागला आहे. टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचे पुण्याचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. शासनाच्या गलथान कारभारानेच रायकर यांचा मृत्यू झाला, असून राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ १५ लाख रूपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या दुदैवी निधनाला कारणीभूत ठरलेल्या सर्व यंत्रणेचा शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी निषेध केला.
गेल्या सहा महिन्यांपासून जागतिक महामारी करोनाशी सरकार बरोबर पत्रकार बांधव देखील लढा देत आहेत. कुठल्याही मदतीविना राज्यात पत्रकार बांधव फिल्डवर काम करत आहेत. जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून काम करित असताना सरकार पातळीवर कुठल्याच प्रकारची मदत किंवा संरक्षण पत्रकारांना मिळत नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांमध्ये भितीचे सावट आहे. या गंभीर गोष्टींचा कुचकामी यंत्रणेचा सरकारचा आणि मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या आधिकाऱ्यांचा शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने निषेध करण्यात आला.
Leave a Review