गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचा टोल माफ

Share this Newz

मुंबई :

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल माफ करण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची माहिती दिली. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरीकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे मंत्री शिंदे यांनी सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.
दरम्यान, करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आयसीएमआरच्या निर्णयानुसार, स्थलांतरितांना नव्या ठिकाणी किमान १४ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. मात्र, रेल्वे व एसटी बंद असल्यामुळं वेळीच गावी जाऊ न शकलेल्या कोकणातील गणेशभक्तांची यामुळं मोठी अडचण झाली होती. ही अडचण राज्य सरकारनं दूर केली आहे. गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता आपल्या घरी किंवा स्थानिक समितीच्या निर्देशानुसार विशिष्ट ठिकाणी फक्त १० दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. त्यामुळं चाकरमान्यांना गणपतीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळू शकणार आहे.


Share this Newz