अफगाणिस्तानवर दहशतवादी तालिबानिंचा ताबा; भारताच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष

Share this Newz

The Newz Biz Team, NEW DELHI

तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याने सद्यस्थितीला अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर चालली चालली आहे. तालिबानच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, भारतीय नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी तालिबानने दिली आहे. पण आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारताने दोन विमाने काबुलला पाठवण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भारताच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आपली भूमिका थोड्याच वेळात जाहीर करणार असल्याचे समजते.

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर काबूल विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. सध्या विमानतळ अमेरिकन सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर झालेल्या गोळीबारात काही लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विमानतळावर मृतदेह दिसत आहेत.

केंद्राचे आदेश मिळताच भारतीय विमाने दिल्लीहून उड्डाण करतील आणि काबुलमध्ये उतरतील. सध्या काबुलचा विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे. सज्ज असलेल्या विमानातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काबुलमधील हमीद करझाई आंततराष्ट्रीय विमानतळावरून होत असलेली हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे.

‘काबुलमधील भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही दोन विमानं सज्ज ठेवली आहेत. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत,’ असे एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. काबुलमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे रात्रीपासून हवाई वाहतूक बंद आहे. एअर इंडियाचं एक विमान दररोज काबुलसाठी उड्डाण करते.

अमेरिका तैनात करणार 6 हजार सैन्य
अमेरिकेने म्हटले आहे की ते आपल्या 6,000 सैनिकांना विमानतळावर तैनात करेल, जेणेकरून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. काबूल विमानतळावर सध्या चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती आहे. देश सोडण्यासाठी हजारो लोक तेथे जमले आहेत. असे बरेच लोक आहेत जे कोणतेही सामान न घेता विमानतळावर पोहोचले आहेत.
काबुलमधून पळून जाताहेत लोक
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन करण्याच्या जवळ आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देश सोडून गेले आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अफगाण नागरिकांबरोबरच इतर देशांतील लोकही येथून पळून जात आहेत. काबूल विमानतळावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. तालिबानने लोकांना आश्वासन दिले आहे की काबूल सोडणाऱ्यांना बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल.


Share this Newz