The Newz Biz Team, पुणे
पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास ज्या शेतक-यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे, अशा विमाधारक शेतक-यांनी अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे कापणीपासून 14 दिवसाच्या आत गारपीट, चक्रीवादळ, अतिवृष्टी, ढगफुटी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सर्वप्रथम Crop Insurance App या मोबाईल ॲपद्वारे पुर्वसूचना देण्यात यावी, मोबाईल ॲपद्वारे शक्य न झाल्यास संबंधित विमा कंपनीच्या 18002660700 या टोल फ्री क्रमांकावर सूचना देण्यात यावी किंवा सदर आपत्तीची माहिती बँक / कृषि विभाग यांना द्यावी. तसेच सदरची माहिती संबंधित बँक / कृषि विभागाकडून संबंधित विमा कंपनीस तात्काळ पुढील 48 तासात पाठविण्यात येईल.
ऑक्टोबर महिन्यात पुणे जिल्हयामध्ये सर्वत्र पाऊस होत आहे. 11 व 15 ऑक्टोबर रोजी ब-याच मंडळामध्ये अतिवृष्टीही झाली आहे. सध्या खरीप पिक कापणी अंतिम टप्प्यात आहे व काही शेतक-यांनी पिके काढून गोळा न करता शेतात वाळविण्यासाठी ठेवलेले असून काही ठिकाणी पिक शेतात उभे आहे. यामध्ये शेतातच काढुन ठेवलेल्या सोयाबिन, बाजरी, खरीप भात पिकांचा समावेश आहे.
ज्या अधिसुचित क्षेत्रातील नुकसान 25 टक्के क्षेत्रापेक्षा कमी असल्यास त्याबाबतीत वैयक्तिक स्तरावरुन कंपनीमार्फत पंचनामे करुन काढणीपश्चात नुकसान भरपाई या सदराखाली नुकसानीस ग्राह्य धरता येते. यासाठी शेतक-यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबाबतची पुर्वसूचना विमा कंपनीस किंवा कृषि विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान कळविताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे.
प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतक-यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल. या समितीमध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषि अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल. विमाधारक शेतक-यांनी वेळेवर नुकसानीची पुर्वसुचना Crop Insurance App द्वारे 72 तासांचे आत नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.







Leave a Review