माध्यमांनी अजेंडा निर्माण करण्याऐवजी शांतीसाठी कार्य करावे : डॉ. एन.राम

एमआयटी डब्ल्यूपीयूत ऑनलाईन दुसऱ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन
Share this Newz

पुणे : देशातील माध्यमांनी कोणताही अजेंडा निर्माण करण्याऐवजी विश्‍वशांतीसाठी कार्य करावे. वाढत जाणार्‍या येलो जर्नालिझम काळात पत्रकारांना स्वयं नियमांचे पालन करणे महत्त्वपूर्ण आहे. या क्षेत्रात वावरताना त्यांनी न्यूट्रल असावे, असे मत द हिंदू पब्लिसिंग ग्रूपचे संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण डॉ. एन.राम यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ऑनलाईन, “दूसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या” उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या परिषदेचा विषय ‘जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका’ हा होता.

नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबधांचे प्रा. पद्मश्री डॉ. पुष्पेष पंथ, टिव्ही ब्रॉड कास्टरचे संपादक आणि राजकीय विश्‍लेषक पद्मश्री आलोक मेहता, राजकीय विश्‍लेषक संजय बारू आणि नई दुनियाचे माजी प्रमुख संपादक श्रवण गर्ग हे अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड आणि कुलगुरू प्रा.डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व लिबरल आर्ट, फाइन आर्ट आणि मिडिया अ‍ॅण्ड जर्नालिझम स्कूलच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. अनुराधा पराशर आदी उपस्थित होते.

डॉ. एन.राम म्हणाले, माध्यमे एका टप्प्यावर पूर्णपणे टोकापर्यंत जातात. आपल्याला जे काही बोलण्याची इच्छा आहे ते आपण सांगू शकत नाही. आपल्याकडे मिडिया चाचण्या असू शकत नाही. असं असलं तरी यलो जर्नालिझममध्ये होणारी वाढ ही भारतीय नागरिकांसाठी सर्वात धोकादायक आहे. यलो जर्नालिझममुळे संस्थेचे नुकसान होते. विश्वासार्हता, माहिती आणि गंभीर मूल्यांकन तपासणीशी संबंधित काम चांगल्या प्रकारे केले गेले पाहिजे.

“कोविड १९ मुळे भारताबरोबरच यूएस आणि अन्य देशातील माध्यमांची स्थिती ही गंभीर झाली आहे. सध्याच्या काळात माध्यमांवर नागरिक किती विश्‍वास ठेवतात हे सांगता येत नाही. लोकशाहीमध्ये पत्रकारितेला मुख्य मिडिया, डिजिटल मिडिया, वेगवेगळ्या भाषेतील पत्रकारिता ही आता कशी वाचवेल हे काळच ठरवेल. यात नैतिकता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून, येलो जर्नालिझमपासून दूर रहावे. पत्रकाराने स्वतःचे आरोग्य सांभाळून न्यूट्रल पत्रकारिता करावी. भारत देश हा विविध जाती धर्मांनी नटलेला असताना आपण समाजात कशा प्रकारे शांती निर्माण करू यावर माध्यमांनी कार्य करावे.

श्रवण गर्ग म्हणाले, नैतिकतेशिवाय पत्रकारिता होऊ शकत नाही. विश्‍वशांती ही एक जागतिक संकल्पना असल्याने त्यासाठी नैतिक पत्रकारिता हीच गरजेची आहे. या क्षेत्रात दोन्हीं बाजू समजून घेऊन मत मांडावे. निवडणूकीच्या काळात देशात व विदेशामध्ये फेक न्यूजला ऊत येतो. त्याचा प्रभाव हा आपोआपच समाजावर पडतो. हे पत्रकारांनी ओळखावे.

संजय बारू म्हणाले, सध्याच्या काळात माध्यमांना बर्‍याच आव्हांनाचा सामना करावा लागत आहे. जागतिक स्तरावर भारतीय माध्यमांची क्षमता किती आहे हे ओळखावे. आजपर्यंत जगातल्या बातम्यांचा समाचार घेणारे गुणात्मक वार्ताहर नाहीत. बातम्यांचे टिप्स मिळणारे वृत्तवाहू वृत्तपत्र असले, तरी या वृत्तांचे खरे कव्हरेज अजून पाहिले गेलेले नाही. संपूर्ण जगातील माध्यमांचे प्रतिनिधी किती आहेत, त्यांच्या बातम्याचा प्रभाव किती पडतो हा ही मुद्दा आहे. वर्तमानकाळात भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोसळली आहे. माध्यमांचे आर्थिक गणित ढासळल्याने बर्‍याच पत्रकारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

आलोक मेहता म्हणाले, माध्यमांनी समाजात प्रपोगंडा पसरवू नये. वर्तमान काळात प्रादेशिक टीव्ही, वृत्तपत्र, युट्यूब यांचा समाजावर अधिक प्रभाव दिसून येतो. त्याचप्रमाणे वाढत जाणारा सोशल मिडिया आणि मोबाईलचाही प्रभाव दिसतो. माध्यमेे हे कोणत्याही शहरापुरती किंवा भाषेपुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे या क्षेत्रात नैतिकता महत्त्वाची आहे.

पद्मश्री डॉ. पुष्पेष पंत म्हणाले, समाजात मीडिया महत्त्वाचा रोल पार पाडतात. पण त्यांनी पत्रकारितेच्या नैतिकतेचे पालन करावे. माध्यमे आणि सरकारचे नाते काय आहे हे तपासणे ही गरजेचे आहे. माध्यमातील व्यावसायिक नैतिकता आणि व्यवसायिक नैतिक पत्रकारिता हे ही तपासणे गरजेचे आहे.

डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे जगात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. स्वामी विवेकांनंदानी भाकीत केल्याप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात शांतता नांदेल. त्याकरीता माध्यमांनी समाजात सुख, समाधान आणि शांती नांदण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

राहुल कराड म्हणाले, माध्यम हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे समाजात त्यांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात शांतता निर्माण करण्यास मदत होईल. माध्यमे हे व्यवसाय नाही, पण समाजाची आजची स्थिती पाहता ते हळूहळू व्यावसायिक रूप धारण करताना दिसत आहेत.

डॉ. एन.टी.राव यांनी स्वागतपर भाषण केले, तसेच प्रा.डॉ. अनुराधा पराशर यांनी यांनी परिषदेची पार्श्‍वभूमी सांगितली. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसचालन, तर प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी आभार मानले.


Share this Newz